
दौंड, पुणे: कडेठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लताताई बाबन ढवळे (वय ५०) असे या मृत महिलेचे नाव असून, ही घटना शनिवारी (ता. ७) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.

शनिवारी दुपारी लताताई ढवळे या आपल्या ऊसतोडणीच्या शेतात काम करत होत्या. काम करत असतानाच बिबट्याने अचानक हल्ला केला आणि त्यांना ऊसाच्या फडात ओढून नेले. प्रतिकार करण्याचा कोणताही वाव न मिळाल्याने काही क्षणांतच लताताईंचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पती, विवाहित मुलगा व विवाहित मुलगी असा परिवार आहे.
या घटनेनंतर कडेठाण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसांपासून या भागातील ऊसाच्या शेतांमध्ये बिबट्यांची वर्दळ वाढली आहे. वरवंड, कासगाव, केडगाव, पाटस आणि नांदगाव या परिसरातील शेतकरी शेतात काम करण्यास टाळाटाळ करत आहेत. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिक त्रस्त असून, वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आणि वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. घटनेचा सविस्तर तपास सुरू असून, बिबट्याचा वावर लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
“शेतकरी महिला लताताई ढवळे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक घटना आहे. बिबट्यांच्या वाढत्या संख्येला नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय पातळीवर ठोस धोरणांची गरज आहे,” अशी प्रतिक्रिया दौंडचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केली.
बिबट्यांच्या वाढत्या प्रजननावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकरी, वनविभाग, आणि स्थानिक प्रशासनाने एकत्रितपणे ठोस उपाययोजना आखणे अत्यंत गरजेचे आहे.